मुख्यमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा : हर्षवर्धन पाटील

इंदापूर – वार्षिक सरासरीपेक्षा सर्वाधिक असा 140 टक्के अधिकचा पाऊस इंदापूर तालुक्यात झाला असल्याने शेतातील खरीप पिके, फळबागा, चारा पिके वाया गेली आहेत. तसेच वादळी पावसाने ऊस पिक जमिनदोस्त झाले असुन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीत तग धरून असलेली उभी पिके सध्या च्या संततधार पावसाने जलमय होऊन पाण्यात आहेत. अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गाला दिलासा देणेसाठी शासनाने इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी भाजपचे नेते व राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे बुधवार दिं 14 रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

इंदापूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी फक्त 525 मि.मी.एवढी आहे. आज (दि.14) अखेर तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिकचा म्हणजे एकूण 1247 मि.मी. विक्रमी पाऊस झाला आहे. आजही मुसळधार दिवसभर सुरूच आहे. वेधशाळेने आणखी परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या 4 महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

एका दिवसात 65 मि.मी. पेंक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी समजली जाते. चालु पावसाळ्यात इंदापूर तालुक्यात आठ ते नऊ वेळा अतिवृष्टी झाली आहे.या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी शेतजमिनीची माती वाहून जाऊन शेतकरी बांधव संकटात सापडले आहेत. त्यामुळे आपत्तीग्रस्त शेतकरी वर्गाला व नागरीकांना दिलासा देणेसाठी शासनाने इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यक आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे. खरीप पिके, फळबागा, चारा पिके व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. तसेच रब्बी व इतर पिके घेणेसाठी शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी या पत्रात मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.

तसेच इंदापूर तालुक्यात काही मंडलमध्ये पर्ज्यनमापक यंत्रे कार्यान्वित नाहीत. त्यामुळे अतिशय चुकीचे पावसाचे अंदाजे आकडे शासनाकडे पाठविले जात आहेत. बावडा येथे मोहिते पाटील साखर कारखान्याच्या पर्ज्यनमापक यंत्रावर आजअखेर पावसाची नोंद 1247 मि.मी. झालली असताना शासनाकडे मात्र फक्त 653 मि.मी. एवढी चुकीची नोंद आहे. त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांकडील झालेल्या पावसाच्या नोदी ग्राह्य धरून शेतकऱ्यांना सहकार्य करावे.तर शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना शासनाच्या ओल्या दुष्काळाच्या सवलती व आर्थिक मदतीची गरज आहे. त्याकरिता शासनाने तातडीने इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.