CM ठाकरेंनी दिले पंचनामे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची अपेक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राज्यभर पावसाचा रुद्रावतार पहायला मिळत आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा तडाखा बसला. राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत.

राज्यात सोलापूर, पंढरपूर, उस्मानाबाद आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच वायूसेना, नौदल, लष्कर यांनी तातडीने मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

परतीचा पाऊस आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सर्वत्र वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने वाहणारे वारे आणि ढगफटीतून निर्माण होणारी अतिवृष्टीची परिस्थिती यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषत: पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्च तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला पूर आला आहे.

या सर्वच परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच गृह विभागांकडून परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी आणि समन्वय आणि संनियत्रणावर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तातडीच्या मदतीसाठी अग्निशमन, पोलीस, महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप आणि आक्रोश व्यक्त होत असून ओल्या दुष्काळाचे पंचनामे न करता, सरसकट मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटापासून आता सरकारनेच तारावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.