Coronavirus Impact : वीज बिल आणि मीटर रीडिंगसंदर्भात उर्जामंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात येत आहे. राज्यभरात उद्यापासून कलम 144 लागू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी बसची सेवा 31 मार्च पर्यंत बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर आता उर्जामत्री नितीन राऊत यांनी वीज बिलासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी, 23 मार्चपासून ग्राहकांचे मीटर रीडींग घेऊ नये आणि बिले देऊ नयेत. सगळे वीज बिल अ‍ॅव्हरेज देण्यात येईल. बिल भरले नसेल तरीही वीज पुरवठा खंडीत करू नये. वीज कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीज चोरी तक्रारीसाठी किंवा बिल तक्रार असल्यास ग्राहकांकडे जाऊ नये अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्राची लालपरी थांबली !
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही संख्या वाढत राहिली तर आपल्याला संकटाचा सामना करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच गावा-गावाला जोडणारी एसटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे.