काँग्रसमध्ये आणखी एका ‘लेटर बॉम्ब’ने खळबळ ! ‘या’ 9 नेत्यांनी पाठवलं सोनिया गांधींना पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसमध्ये अद्यापही धुसपूस सुरुच आहे. कारण आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यांकडून आणखी एका पत्राचा बॉम्ब फोडण्यात आला आहे. परंतु यावेळी हे पत्र महाराष्ट्रातून नाही तर उत्तर प्रदेशातून पाठवण्यात आले आहे. काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष चालवावा, असा सल्ला दिला असल्याची माहिती देण्यात येत आहे. तसेच काँग्रेसला आता घराणेशाहीच्या आकर्षणाच्या पलीकडे जाऊन काम करावं लागेल असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या नेत्यांनी पाठवले पत्र
सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर माजी खासदार संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भुधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह यांनी स्वाक्षरी केली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था सगळ्यात वाईट आहे, असे पत्रात म्हटले आहे.

काँग्रेसमध्ये ढिसाळ कारभार सुरू
सोनिया गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सध्या काँग्रेसमध्ये ढिसाळ कारभार सुरु आहे. राज्यामध्ये कसा करभार सुरु आहे याची माहिती तुम्हाला प्रभारी यांच्याकडून मिळत नाही असं दिसतंय. आम्ही आपल्याला भेटण्यासाठी गेल्या एक वर्षापासून मागणी करत आहोत. पण आम्हाला नकार दिला जात आहे. काही मंडळी ही वेतन तत्त्वावर काम करतात आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत अशा लोकांकडे पदं आहेत, असा दावा या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रातून केला आहे.

अन्यथा काँग्रेस इतिहास जमा होईल
या नेत्यांना पक्षाची विचारधारा माहित नाही. पण, त्यांना उत्तर प्रदेशात काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी संवाद साधून हा पक्ष चालवावा. अन्यथा काँग्रेस इतिहास जमा होईल असं या पत्रात म्हटले आहे.

प्रियंका गांधींनाही लक्ष्य केलं
उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना देखील या पत्रात लक्ष्य करण्यात आलं आहे. चार पानांच्या पत्रामध्ये सोनिया गांधी यांनी घराणेशाही पलिकडे जावून काम करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे या सगळ्यावर आता काँग्रेसमध्ये आणखी एकदा वादळ येण्याची शक्यता आहे. यावर पक्षश्रेष्ठी या प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.