Coronavirus : ‘लॉकडाऊन’मध्ये माजी पंतप्रधानांच्या नातवाचे लग्न, सोशल डिस्टन्सिंगची ‘ऐशीतैशी’
बंगलुरू : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असं आवाहन केलं जात आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला असताना दुसरीकडे देशाचे माजी पंतप्रधान आणि जनता सेक्युलरचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडांच्या नातवाचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. देवेगौडा यांचा नातवाचा विवाहसोहळा आज (दि.17) सकाळी बंगळुरूमध्ये पार पडला. देवेगौडांचा नातू म्हणजे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल याचा विवाह काँग्रेसचे माजी मंत्री एम. कृष्णप्पा यांची भाची रेवती हिच्यासोबत थाटात पार पडला.
Karnataka: Nikhil Kumarswamy, son of former Karnataka CM HD Kumaraswamy, tied the knot with Revathi, the grand-niece of former Congress Minister for Housing M Krishnappa, today in Bengaluru. pic.twitter.com/HrLpGD5s9p
— ANI (@ANI) April 17, 2020
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक ठिकाणी लोकांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र, एका वृत्तवाहिनीने जारी केलेल्या विवाहसोहळ्याच्या फोटोवरूर या विवाहसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे.
वृत्तसंस्थेने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये लग्न मंडपात लोकांची गर्दी दिसून येत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान देवेगौडा हे धार्मिक विधीमध्ये सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. कालच कुमार स्वामी यांनी निखिलच्या लग्न सोहळ्याचा कार्यक्रम भव्यदिव्य नसेल असे सांगितले होते. लग्नाला केवळ 10 ते 15 लोकं उपस्थित असतील अशी माहिती त्यांनी दिली होती. मात्र फोटोमध्ये अनेक लोक या लग्नसोहळ्याला उपस्थित असल्याचे दिसून येत आहे.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरून याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांनी पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे तर काहींनी किमान नेत्यांनी तरी सामान्यांसमोर आदर्श ठेवावा असं मत व्यक्त केलं आहे. तर काहींनी हा लॉकडाऊन फक्त सामान्यांसाठीच आहे का असा प्रश्न विचारला आहे. तर लॉकडाऊनचे नियम हे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे असल्याचे मत व्यक्त केले आहे.