महाराष्ट्र सरकारने राजकारण करणे बंद केले पाहिजे : देवेंद्र फडणवीस

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या महामारीत राज्य आणि केंदृ सरकारमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडून मागणीपेक्षा कमी रेल्वे मिळत असल्याचे म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राजकारण करणे बंद केले पाहिजे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर खापर फोडत असून हे चुकीचे आहे. रेल्वे मंत्री आणि मंत्रालयाने महाराष्ट्राला वारंवार मदत केली आहे. असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला 525 ट्रेन देण्यात आल्या आहेत, ज्यामधून 7 लाख 30 हजार श्रमिकांनी प्रवास केला आहे. जितक्या ट्रेन मागितल्या जात आहेत, त्यामध्ये स्वत: रेल्वे मंत्री लक्ष घालत असून ट्रेन पुरवत आहेत. अनेकदा रात्री उशिरा यादी पाठवल्यानंतरही ट्रेन दिल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेत्यांनी केलेले वक्तव्य पूर्ण राजकारण आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती खूप वाईट असून देशातील 30 टक्के रुग्ण राज्यात आहेत. तब्बल 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. हे सरकार पूर्पणपणे अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारवर टीका केली जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.