Coronavirus in Maharashtra : दिलासादायक ! राज्यातील कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार? डॉ. तात्याराव लहानेंनी दिली महत्वाची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आता कधी ओसरणार? लोकांना पूर्वीसारखे जीवन कधीपासून जगता येईल, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. दरम्यान कोरोनाच्या प्रसाराबाबत सकारात्मक माहिती समोर आली आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट लवकरच ओसरणार असल्याची दिलासादायक माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे. राज्यात रविवारी (दि. 2) रुग्णांची संख्या 56 हजार होती. संख्या अशीच स्थिर राहिली किंवा खाली आली तर आलेख खाली येतोय, असे म्हणावे लागेल. कोरोना 16 फेब्रुवारी रोजी अमरावतीत आला. जगातील इतर देशांच्या अभ्यासानुसार कोरोना 90 दिवसांनी कमी होत असतो. त्यामुळे 15 मे ते 25 मे च्या दरम्यान कमी होताना दिसेल, असे डॉ. लहाने म्हणाले.

डॉ. तात्याराव लहाने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात 5 नव्हे तर 1 हजार स्ट्रेन आढळले आहेत. आपल्याला फक्त हे बघायचे आहे की, हा स्ट्रेन जास्त संसर्ग वाढवणारा आहे का? तो शरीरावर जास्त परिणाम करणारा आहे का? असे स्ट्रेन प्रत्येक 3 महिन्यांनी आढळतात. त्यामुळे या नव्या स्ट्रेनचा अभ्यास सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले. साधारणपणे पहिल्या लाटेत 50 वयाच्या वरील लोकांना संक्रमण झाले होते. दुसर्‍या लाटेत तरुण मोठ्या प्रमाणात संक्रमित होताना दिसत आहेत. वाढता धोका लक्षात घेता18 वर्षावरील सर्वांना लसीकरण होत असून त्यांना संरक्षण मिळणार आहे. राहिलेले 12 ते 18 वयोगटातील मुले तिस-या लाटेत बाधित होतील, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. साथीच्या रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केल्याचे डॉ. लहाने यांनी म्हटले होते.