स्वदेशी कोव्हॅक्सिन पुढील वर्षी शक्य ?, भारत बायोटेकने दिली माहिती

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आता भारतातही दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनावरील लसीशिवाय पर्याय उरला नाही. भारतात भारत बायोटेक आणि आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्याची चाचणी सध्या सुरू आहे. या दरम्यान, भारत बायोटेकच्या प्रमुखांनी या लसीबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे.

भारत बायोटेकचे प्रमुख साई प्रसाद यांनी सांगितले की, कोव्हॅक्सिन भारताची पहिली व्हॅक्सिन आहे. डब्ल्यूएचओ, यूएस एफडीए आणि भारताच्या सीडीएससीओ यांनी ५० टक्के प्रभावी लसीची अपेक्षा केली आहे. आम्ही कोव्हॅक्सिनसाठी ६० टक्के प्रभावी असल्याची अपेक्षा ठेवली आहे.

तिसऱ्या टप्प्यात हि लस यशस्वी झाल्यानंतर या लसीवर पुढील काम केले जाईल. आम्ही ही लस उपलब्ध करण्यासाठी विनियामक अनुमतीसाठी अर्ज करणार आहोत. तसेच आम्ही चौथ्या टप्प्यातील चाचणीसुद्धा सुरू ठेवणार आहोत. याशिवाय जर आम्ही परीक्षणाच्या आपल्या अंतिम टप्प्यात योग्य पुरावे आणि प्रभावी सुरक्षा डेटा मिळवण्यात यशस्वी ठरलो तर २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ही लस उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे, असे साई प्रसाद यांनी सांगितले.

हैदराबादस्थित भारत बायोटेकने आपल्या लसीची पहिली झलक दाखवली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू केली आहे. यामध्ये भारतातील २५ केंद्रावर २६ हजार स्वयंसेवकांवर चाचणी होणार आहे. ही चाचणी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या भागीदारीमध्ये होत आहे. या स्वयंसेवकांना पुढील वर्षापर्यंत देखरेखीखाली ठेवण्यात येईल आणि लसीच्या प्रभावाचे परीक्षण केले जाईल.

देशात कोरोना रुग्णसंख्या ९० लाख ५० हजारांवर
देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून शनिवारच्या आकडेवारीनुसार बाधितांची संख्या ९० लाख ५० हजार ५९७ वर पोहोचली आहे. तर देशभरात १ लाख ३२ हजार ७२६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे ४ लाख ३९ हजार ७४७ ऍक्टिव्ह रुग्ण सापडले आहे.