गाईच्या तुपात कॅन्सरशी लढण्याची ताकद, संशोधकांचा दावा

पोलिसनामा ऑनलाइन टीम – हरियाणाच्या करनालमधील नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटने गाईच्या तुपावर संशोधन केले असून य संशोधनात असे आढळून आले आहे की, वनस्पती तेलाच्या सेवनाऐवजी गाईच्या शुद्ध तुपाचे सेवन केल्याने कॅन्सरशी सामना करण्याची शरीराची ताकद वाढते. गाईच्या तुपातील मायक्रो न्यूट्रियंट्समध्ये कॅन्सरशी लढण्याची क्षमता आहे.

शरीरात जमा होणाऱ्या अनावश्यक चरबीमुळे कॅन्सरला कारणीभूत तत्त्वे वाढतात, असे या संशोधनात म्हटले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अंकात ही माहिती देण्यात आली आहे.हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी २१ दिवसांच्या तीस-तीस उंदरांचे दोन समूह केले होते. विशिष्ट रासायनिक तत्त्वांच्या वापर करून त्या उंदरांमधे कॅन्सर निर्माण करण्यात आला. वैज्ञानिकांनी सुमारे ४४ आठवडे या उंदरांच्या दोन समूहापैकी एका समूहाला गायीच्या शुद्ध तुपापासून बनवलेले भोजन दिले.

तर दुसऱ्या समूहाला वनस्पती तेलापासून बनवलेले भोजन दिले. या प्रयोगातून असे दिसून आले की, सोयाबीन तेलयुक्त खाद्य दिलेल्या उंदरांच्या ज्या समूहामध्ये कॅन्सर वाढण्याची प्रवृत्ती तुलनेने जास्त दिसून आली. तर कॅन्सरशी लढण्याची ताकद गायीच्या तुपापासून बनवलेले खाद्य खाणाऱ्या उंदरामध्ये जास्त दिसून आली.

हे संशोधन सुरू असताना सोयाबीन तेलयुक्त खाद्य खाणाऱ्या अनेक उंदरांचा मृत्यूही झाला. वनस्पती तेलयुक्त खाद्य खाणाऱ्या उंदरांमध्ये, असे खाद्यान्न न घेणाऱ्यांच्या तुलनेत कॅन्सर होण्याची शक्यताही जास्त दिसून आली. सध्या तेलकट, फास्ट फूड खाण्याची प्रवृत्ती वाढते आहे. तसेच तोंडाचा आणि छातीचा कॅन्सरही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.