Mumbai CP हेमंत नगराळे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले -‘सध्या मुंबई पोलीस दल कठीण समस्येतून जात आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सचिन वाझे प्रकरणात वादात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर आज (बुधवार) बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली. आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सध्या मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात असल्याचे बोलून दाखवले.

महाराष्ट्र सरकारने हेमंत नगराळे यांच्या बदलीचे आदेश काढल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन दिली. त्यानंतर हेमंत नगराळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन मुंबई पोलीस आयुक्तालयात पदभार स्वीकारण्यासाठी दाखल झाले. सायंकाळी सातच्या सुमारास नगराळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली

हेमंत नगराळे म्हणाले, सध्या मुंबई पोलीस कठीण परिस्थितीतून जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी माझी नेमणूक झाली आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मुंबई पोलीस दलावर कोणत्याही प्रकारची टीका होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील राहू. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असून ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी त्यांनी असं झालं तर कसं होईल असे प्रश्न न विचारता आणि सुरु असलेल्या तपासाबाबत न विचारता फॅक्ट बेस प्रश्न पत्रकारांनी विचारावेत.

म्हणून माझी आयुक्तपदी नियुक्ती

सध्या मुंबई पोलीस कठीण परिस्थितून जात आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने माझी आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. मुंबई पोलीस दलाची मलिन झालेली प्रतिमा येत्या काही दिवसांत चांगली करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. यासाठी मुंबई शहरातील अधिकारी आणि कर्मचारी, मग ते खालच्या दर्जापासून वरिष्ठ पातळीपर्यंत सगळ्यांचे सहकार्य मला लाभणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दोषींवर कारवाई करण्यात येईल

सचिन वाझे प्रकरणात रितसर तपास एनआयए आणि एटीएसकडून सुरु आहे. योग्यरितीने तपास होईल याची खात्री आहे, जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे नगराळे यांनी सांगितले. तसेच मुंबई पोलीस दलाचे नाव चांगले होईल, पोलीस दलावर कोणतीही टीका होणार नाही अशी परिस्थिती निर्माण करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.