मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दलित पँथर चे संस्थापक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे मंगळवारी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.
राजा ढाले (जन्म १९४०) हे आंबेडकरी चळवळीतील एक भारतीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक व राजकारणी म्हणून लोकप्रिय होते. अरुण कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या बरोबर त्यांनी दलित पँथर या लढवय्या संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट १९७२ च्या साधना विशेषांकात राजा ढाले यांचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडली व दलित पँथरला प्रसिद्धी मिळाली. दलित पँथर जेव्हा सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येंने तरुणांनी पँथरमध्ये प्रवेश केला. प्रत्येकाला पँथरही आपल्या मनातील असंतोषाचे व्यासपीठ वाटत होती. सर्व तरुण बेदरकार होते. विचाराने वेगळ्या असलेल्या पण एकदिलाने काम करणाऱ्या तरुणांची संघटना म्हणून सुरुवातीच्या पँथर चळवळीकडे पाहिले गेले.
पँथर संघटनेचे नेते नामदेव ढसाळ कम्युनिस्टवादी व राजा ढाले हे आंबेडकरवादी असा वाद पुढे आला. १९७४ साली नामदेव ढसाळ यांनी नागपूर येथे दलित पँथरचे अधिवेशन भरविले व स्वत:चा गट वेगळा केला; तर १९७६ साली राजा ढाले यांच्या गटातून भाई संगारे व अविनाश महातेकर बाहेर पडले; त्यांनी संगारे, महातेकर गट निर्माण केला.
७ मार्च १९७७ ला राजा ढाले यांनी नाशिक येथे आपल्या गटाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन तेथे पँथर बरखास्तीचा निर्णय घेतला. व ‘मासमुव्हमेंट’ या संघटनेची स्थापना केली. राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण त्यांना यश मिळू शकले नाही़ २००४ साली ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.
प्राचीन काळात किल्ल्यात राहून गडकिल्ल्यांचे अहोरात्र संरक्षण करणारे आणि युद्धात आघाडीवर भला मोठा फडकणारा ध्वज घेऊन उभे असणारे लोक म्हणजे ढाले, असा खुद्द राजा ढालेंनीच आपल्या आडनावाच्या लोकांचा इतिहास शोधून काढला आहे. हे लोक ध्वज खाली पडू देत नसत. एक घायाळ झाला की दुसरा त्याची जागा तडफेने घेऊन ध्वज वरच्यावर झेलत असत.
तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी अनियतकालिकांत राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि संपादने हे सारे साहित्य विखुरलेले आहे. राजा ढाले यांच्यावर ‘खेळ’ या नियतकालिकाचा विशेषांक प्रकाशित झालेला आहे. पुणे महापालिकेने त्यांना आंबेडकर पुरस्कार देऊन २०१५ मध्ये गौरव केला होता.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक; दलित पँथर चा महानायक हरपला आहे, अशी शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली.
गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका
भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी
जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे
‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती
‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या
मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी