लग्नानंतर महिन्या भराने दीपिका ने दिली धक्कादायक माहिती. 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाला महिना लोटून गेला. पण या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता तर हे कपल आणखीनच चर्चेत आले आहे. याला कारण आहे, दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू. होय, फिल्मफेअरला दीपिकाने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान दीपिकाने दिलखुलास गप्पा मारल्या. या मुलाखतीत दीपिकाने रणवीर आणि तिच्या नात्याविषयी अनेक गुपितं सांगितली आहेत. या मुलाखतीत तिने एका गोष्टीचा खुलासा केला आहे. तिने मुलाखतीत सांगितले आहे की, रणवीर आणि तिचा साखरपुडा चार वर्षांपूर्वीच झाला होता. खरे तर 2016 मध्ये त्या दोघांच्या साखरपुड्याची चर्चा मीडियात रंगली होती. पण त्या दोघांनीही या चर्चांवर मौन राखणेच पसंत केले होते. पण आता दीपिकाने दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या साखरपुड्याविषयीची बातमी सांगून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
या मुलाखतीत लग्नावरही दीपिका भरभरून बोलली. रणवीर माझ्या भांगात कुंकू भरत असताना मला ‘ओम शांती ओम’ चा ‘एक चुटकी सिंदूर’ हा डायलॉग आठवत होता. मी अनेक लग्नाला गेले. पण स्वत:चे लग्न हा किती खास क्षण असतो, हे मला माझ्याच लग्नावेळी जाणवले, असे दीपिका यावेळी म्हणाली. मी अनेक वर्षे एकटी राहिली. पण आता रणवीर माझ्यासोबत राहात आहे. रणवीर त्याच्या कामावर जातो आणि मी माझ्या. पण सकाळी आम्ही एकत्र उठतो. ही लग्नाची सर्वात खास बाब आहे, असेही तिने सांगितले.
रणवीरसोबतच्या लव्हस्टोरीबद्दलही तिने खुलासा केला. मी रणवीरला अनेक अवॉर्ड इव्हेंटमध्ये भेटले होते. पण ‘रामलीला’च्या शूटींगच्यावेळी आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. आम्हाला एकत्र आणण्यात संजय लीला भन्साळींचा सर्वात मोठा हात आहे, असे तिने सांगितले.
दीपिका आणि रणवीर यांनी 14 नोव्हेंबरला कोंकणी तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने लग्न केले. त्यांचा विवाहसोहळा इटलीतील लेक कोमो या नयनरम्य परिसरात पार पडला. लग्नानंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी बंगळूरू आणि मुंबईत रिसेप्शन ठेवले होते.