सत्तेत असूनही विरोधकांचं काम शिवसेना का करते? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

आम्ही कोणतीही गोष्ट उघडपणे केली. साथ दिली ती उघडपणे आणि विरोध केला तोसुद्धा उघडपणे असे सांगून शिवसेना आज सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करीत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4cea785b-8e37-11e8-82b3-913ed69852ff’]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीचा पहिला भाग आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये उद्धव यांनी केंद्रातील मोदी सरकारची धोरणं, राष्ट्रीय राजकारण, भाजपाची भूमिका, छत्रपती शिवरायांचे स्मारक, शेतकऱ्याचे आंदोलन यांसारख्या विविध विषयांवर परखड भाष्य केले आहे. राजकारणात विश्वासाला खूप महत्त्व आहे, मात्र विश्वासाला जागणारी पिढी आता आहे का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह या जोडगोळीवर शरसंधान साधले. चाणक्य निती ऐवजी ग्लोबेल्स निती समजून घेण्याचा सल्ला ही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

शिवसेना विरोधकांचे काम का करते असे विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधी पक्ष काय करतायेत हे जनतेनी पाहिलेय. आम्ही कधीही आडून कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत. साथ दिली तीसुद्धा उघडपणे दिली आणि विरोध केला तोही उघडपणेच केला. शिवसेना आज सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवण्याचे काम करतेय. आमच्याकडे मंत्रीपद आहे कारण लोकसभेची निवडणूक आम्ही एकत्र लढलो होतो. त्यावेळी देशामध्ये जो काही कारभार चालला होता आणि आजही काही वेगळा कारभार चाललाय असे मला वाटत नाही, त्यात कुणीतरी बदल करेल अशी देशातील जनतेप्रमाणे आम्हालाही आशा होती. चांगल्या गोष्टी अजिबातच झाल्या नाहीत असे नाही. पण काही गोष्टी गोरगरीब जनतेच्या हिताच्या नाहीत, तिथे सत्तेत असलो तरी आम्ही विरोध करणारच. कारण आम्ही मित्र आहोत ते देशाच्या जनतेचे.

शिवसेना भारतीय जनतेचा मित्र आहे. कोणत्याही एका पक्षाचा मित्र नाही. म्हणूनच वेळोवेळी एखादी गोष्ट आम्हाला पटली नाही किंवा पटणार नाही, तेव्हा आम्ही बोलतोच. आम्ही सरकारच्या एखाद्या भूमिकेला वा धोरणाला विरोध केला तो देशाच्या, जनतेच्या हितासाठीच.

सत्तेत असूनही अविश्वास ठरावावर मतदानात भाग का घेतला नाही, यावर ते म्हणाले, सरकारला मतदान करायचेच असते तर इतके दिवस आम्ही सरकारच्या निर्णयावर हल्ला का चढवला असता? आज जे सगळे मिळून बोलताहेत तीच भूमिका शिवसेनेने आधीच मांडली होती. मग नोटाबंदी असेल, जीएसटी असेल, भूसंपादन कायद्याबद्दल असेल, विषय कोणताही घ्या, आज सगळे जण एकत्र बोलताहेत. पण त्या वेळेला याविरोधात बोलण्याचे धाडस फक्त शिवसेनेनेच दाखवलेय, म्हणूनच मी म्हणतो की, सत्तेमध्ये आम्ही आहोत, पण विश्वासदर्शक-अविश्वासदर्शक हा जो काही प्रकार आहे. नेमका कुणी कोणावर विश्वास आणि अविश्वास दाखवायचा? आम्ही विरोधी पक्षात जाऊन सरकारविरोधात मतदान करायचे का? विरोधी पक्षाने तरी असं काय केलं आहे? जेव्हा शिवसेना जनतेच्या विषयांवर आवाज उठवत होती तेव्हा हे पक्ष कुठे होते? गोरगरीबांची विल्हेवाट लावणारी नोटाबंदी केली गेली. मला माहितेय की, दुसºया की तिसऱ्या दिवशी एकट्या शिवसेनेने देशभरात आवाज उठवला होता. त्या वेळी वातावरण असे होते की, याविरोधात जो बोलेल तो देशद्रोही. मग शिवसेनेने तेव्हा उचललेले मुद्दे आज सगळे जण घोकताहेत आणि बोलताहेत. माझी मैत्रीची व्याख्या वेगळी आहे. मित्र एखादी गोष्ट चुकत असेल तर ती परखडपणे सांगणारा तो खरा मित्र. वाहवा करणारे, भाटगिरी करणारे ते मी मित्र मानत नाही. देशाच्या जनतेसाठी एखादी गोष्ट सरकारची अगदी त्या सरकारमध्ये सहभागी असल्यानंतरही चुकत असेल तर परखडपणे सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ते मी करणार.

चाणक्यनितीपेक्षा गोबेल्सची नीती समजून घेण्याच्या सल्ला उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांना दिला. कारण, चाणक्याच्यावेळी निवडणुका नव्हत्या, तर ग्लोबेल्सवेळी निवडणूका होत्या, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच, निवडणुका जिंकण्यासाठी आता नीतिमत्तेची आवश्यक्ता उरली आहे काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

जाहिरात