उद्योजकांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे, म्हणाले – ‘Lockdown मधून औद्योगिक क्षेत्राला वगळा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यभरात कडक लॉकडाऊन करण्याचा विचार ठाकरे सरकारकडून जवळपास पक्का झाला आहे. 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन केल्यास उद्योगनांना मोठा फटका बसण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे  औदयोगिक क्षेत्राला लॉकडाऊनमधून वगळावे अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील औद्योगिक क्षेत्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत आहे.  गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे.  त्यात आता पुन्हा लॉकडाऊन केल्यास  उद्योजकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. गेल्या लॉकडाऊनच्या काळात परप्रांतिय कामगार गावाकडे गेल्याने आणि आताही लॉकडाऊनच्या भीतीने कामगार गावी जात असल्याने  उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांनी मोठी कर्जे काढून उद्योगाची उभारणी केली आहे.

अशा उद्योजकांना कजार्चे हप्तेही भरता येणे अवघड होणार आहे.  आता पुन्हा एकदा लॉकडाऊन  झाल्यास अनेक कंपन्यांना कुलूप लावावे लागेल, तसेच कामगारावर देखील बेकारीची वेळ येईल अशी भीती असोसिएशनचे  जामदार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला लॉकडाऊनमधून अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.