डान्सबार बंद झाल्यामुळे अनेक महिलांनी ‘तो’ व्यवसाय सुरु केला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डान्सबारसंदर्भात राज्य सरकारच्या कठोर अटी सुप्रीम कोर्टाने शिथील केल्या आहेत. यामुळे मुंबई आणि राज्यात डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. राज्य सरकारचे अनेक नियम सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने आता मुंबई व राज्यातील डान्सबार सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत डान्सबार सुरु ठेवण्याची अट सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे.
वेश्याव्यवसायापेक्षा डान्सबार केव्हाही चांगले असं मत सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी व्यक्त केलं आहे. राज्य सरकारनं डान्स बारसंदर्भात लागू केलेल्या अटींविरोधात काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं डान्स बार मालकांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यामध्ये पुन्हा डान्सबार सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना वर्षा काळे यांनी सांगितले की, “डान्स बार हा खूप मोठ्या संख्येने महिलांसाठी रोजगाराचं साधन होता. सरकारनं लादलेल्या अटी इतक्या जाचक होत्या की त्यांच्यासह डान्स बार चालवणं अशक्य होतं. आणि डान्स बार बंद झाल्यामुळे अनेक बारबालांना रोजगारासाठी वेश्याव्यवसायाकडे वळावं लागलं. भारतामध्ये वेश्याव्यवसायाला संरक्षण नसून हा अत्यंत जोखमीचा व्यवसाय आहे. तसंच वेश्याव्यवसायापेक्षा महिलांना डान्स बारमध्ये अधिक सन्मानानं काम करता येईल असं माझं मत आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे डान्स बार चालकांना तसंच डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे अशी भावना काळे यांनी व्यक्त केली आहे.