दिलासादायक ! दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र 3 KM च्या परिसरातच असणार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –  दहावी- बारावीच्या परीक्षांसाठी दोन्ही वर्गातील सुमारे 32 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, राज्यातील कोरोना अद्याप संपला नसल्याने एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीप्रमाणे ठरलेल्या केंद्रांवर घेणे अशक्य मानले जात आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रे वाढतील असा अंदाज आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 3 किलोमीटरच्या परिसरात परीक्षा केंद्रे असणार आहेत. दरम्यान, कोरोनाची संभाव्य स्थिती विचारात घेऊन परीक्षांचे नियोजन केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे परीक्षा घ्यायला हरकत नसल्याचे मत पुणे बोर्डाने व्यक्त केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार 25 टक्‍के अभ्यासक्रम वगळून प्रश्‍नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत. परीक्षांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षा केंद्रे वाढणार की नाहीत, पूर्वीच्याच परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार याबद्दल विभागाने काहीच घोषणा केलेली नाही.

याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर म्हणाले की, परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वीच निश्‍चित झाले असून विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्जही भरून घेतले आहेत. पुणे बोर्डाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील शाळा व त्या ठिकाणच्या आसन क्षमतेची माहिती सादर केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची सोय होईल, अशा ठिकाणीच दरवर्षीप्रमाणेच परीक्षा केंद्रे असतील त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

ठळक मुद्दे

23 एप्रिल ते 29 मे या वेळेत होणार 12 वीची परीक्षा; जुलैअखेर लागणार निकाल

10 वी ची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मेपर्यंत; ऑगस्टअखेर निकालाची शक्‍यता

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 28 ते 31 मेदरम्यान होणार; दोन सत्रात होईल परीक्षा