Gram Panchayat Election : राज्य सरकारचा मोठा निर्णय ! आधी निवडणुका नंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या आणि मुदत संपलेल्या राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मात्र या ग्रामपंचातयींच्या सरपंचपदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी जानेवारीमध्ये आरक्षण सोडत होणार आहे.

सरपंचपदासाठी होणार घोडेबाजार थांबावा, तसेच खोटी जात प्रमाणपत्रे दाखवून निवडणुका लढवण्याचे प्रकार वाढत असल्याने हा निर्णय घेतल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर केले होते. ते आरक्षणही या नव्या आदेशानंतर रद्द केले आहेत.

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान; तर 18 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी येथे केली. यानिमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण रंगणार आहे.

एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च रोजी मतदान होणार होते; परंतु कोरोनाची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित केला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द केला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

उमेदवारी अर्ज 30 डिसेंबरपर्यंत
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंत असेल.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार केलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रा.पं.ची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 158, पालघर- 3 रायगड-88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70 नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमदनगर- 767, नंदुरबार- 87 पुणे-748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475 लातूर- 408 ,हिंगोली- 495, अमरावती- 553 , अकोला- 225, यवतमाळ- 980 , वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629 , भंडारा-148 गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14234.