मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेभाभरती सुरु होती. त्यावेळी अनेकजण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये गेले, त्या नेत्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता ‘घरवापसी’ची साद घातली आहे.
हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी बुधवारी (दि. 16) उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
आज, जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह @NCPspeaks मध्ये प्रवेश केला. यावेळी, माझ्यासह जलसंपदा मंत्री @Jayant_R_Patil, ग्रामविकास मंत्री @mrhasanmushrif आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/aOh0ahKPqg
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 16, 2020
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड आणि आता राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जे कुणी राजीनामा देऊन महाविकास आघाडीत प्रवेश करतील त्यांच्याविरोधात भाजप सहाजिकच उमेदवार देईल. पण आम्ही तीनही पक्ष आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करु, असे पवार म्हणाले. आघाडीचे सरकार येणार नाही, असे समजूनही अनेक जण तिकडे गेले. पण आता त्यांनाही आघाडी सोडून का गेलो? असे वाटायला लागल्याची सद्यस्थिती असल्याचेही पवार म्हणाले.
अनेकजण राष्ट्रवादीच्या वाटेवरः पवार
विविध पक्ष, प्रांत आणि समाजातील नेते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. विरोधकांनी निवडणुकीवेळी अनेक आश्वासन आणि प्रलोभन देऊन त्यांना पक्षात घेतले होते. पण आता येत्या काळात अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे पवार म्हणाले.