…..म्हणून एकाच पायावर ‘तो’ धावला तब्बल 3 किलोमीटर 

उडुपी : वृत्तसंस्था – एकाच पायाने तो चक्क 3 किलोमीटर धावला आणि त्याच्यामुळे मोठी रेल्वे दुर्घटना टळली. आजकाल कोणीही दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करत नाही. त्यातही कोणाचा जीव वाचवण्यासाठी तर कोणी इतके कष्ट आजच्या काळात घेणे म्हणजे विशेषच आहे. दोन्ही सही सलामत असतानाही कोणी इतके धावणार नाही. आणि आणीबाणीच्या प्रसंगी प्रसंगावधान दाखवणे सर्वांनाच जमतंच असं नाही. अशाच प्रकारे प्रसंगावधान राखून एकाने 3 किलोमीटर धावत मोठा रेल्वे अपघात टाळला आणि तेही एकाच पायावर. उडुपी येथील ही घटना असून कृष्णा पुजारी असं या व्यक्तीचं नाव आहे.
कृष्णा पुजारी यांचा एक पाय अधू आहे. ते 53 वर्षीय असून शनिवारी ते मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांनी वाटेत रेल्वे ट्रॅकच्या रुळाला तडे गेल्याचे पाहिले. आता काय करावं याचा विचार ते करत असतानाच अचानक एक ट्रेन त्या रुळांवरून धडधडत गेली. त्यामुळे रूळ तुटला. या आणीबाणीच्या वेळी कृष्णा यांनी प्रसंगावधान दाखवत रेल्वे कार्यालयाच्या दिशेने पळण्यास सुरुवात केली. अधू पायानिशी सुमारे तीन किलोमीटर धावत त्यांनी रेल्वे रूळ तुटल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली.  त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन रेल्वे गाड्यांना तातडीने थांबण्याची सूचना दिली. एक रेल्वे घटनास्थळापासून सात किमी अंतरावर तर दुसरी गाडी 16 किमी अंतरावर थांबवण्यात आली. त्यामुळे मोठा अपघात टळला.
कृष्णा पूजारी यांचा डावा पाय काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अधू झाला होता. त्यामुळे त्यांना नीट चालता येत नाही. पायाचे दुखणे कमी व्हावे म्हणून त्यांना डॉक्टरांनी दररोज सकाळी नियमित चालण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, शनिवारी ते मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हा सगळा प्रकार घडला.