माजी वेगवान गोलंदाजाचे वयाच्या 33 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   भारतीय क्रिकेट विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादव (वय 33) याचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी (दि.24 निधन झाले. अश्विनच्या निधनाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अश्विनच्या मागे पत्नी, तीन मुले आहेत.

अश्विन यादवच्या मृत्यूनंतर भारतीय टीमचे बॉलिंग प्रशिक्षक आर.श्रीधर यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. अश्विनच्या निधनाची बातमी ऐकून मी गळून पडलो आहे. तो नेहमी आयुष्य जगायचा आणि कायम टीमसाठी खेळायचा. अश्विन शानदार फास्ट बॉलर होता. त्याच्या कुटुंबाला हे दु:ख पचवण्याची शक्ती मिळो, ही इश्वर चरणी प्रार्थना. तुझी कायमच आठवण येईल असे ट्विट श्रीधर यांनी केले आहे. तर अश्विनसोबत खेळलेला ऑफ स्पिनर विशाल शर्मा यानेही त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. अश्विनच्या चेहऱ्यावर कायमच हसू असायचे. टीमसाठीच कायम खेळायचा. अश्विनचा मृत्यू झाला आहे, यावर माझा अजूनही विश्वास बसत नसल्याचे शर्मा म्हणाला.

अश्विन यादवची क्रिकेट कारकीर्द

2007 साली अश्विनने मोहालीत रणजी ट्रॉफी सामन्यातून पदार्पण केले होते. हैदराबादसाठी त्याने 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 34 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 10 लिस्ट ए मॅच खेळल्या, ज्यात त्याला 4 विकेट मिळाल्या. दिल्लीविरुद्ध 2008-09 मध्ये त्याने 52 रन देऊन 6 विकेट घेतल्या, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. अश्विनने 2009 साली मुंबईविरुद्ध शेवटची रणजी ट्रॉफी मॅच खेळली. यानंतर तो स्टेट बँक ऑफ हैदराबादसाठी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळत होता.