‘माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेणार्‍यांना मी हा ‘पद्मश्री’ समर्पित करतेय : सिंधुताई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंताना केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. आज एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

समाजसेविका सिंधुताई सपकाळ, पुरुषोत्तम गंगावणे, नामदेव कांबळे, जयंतीबेन पोपट, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर, सिंधुताईसह इतरही पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

… यांच्यासाठी ‘पद्मश्री’ समर्पित: सिंधुताई
मी कधी कल्पना केली नाही, असं काही तरी घडलं आहे. मला फक्त जगायचं आणि जगवायचं होतं. एवढाच फक्त माझा उद्देश होता. माझी लेकरं, लोकांनी दिलेला आधार आणि माझ्या कार्याची वेळोवेळी दखल घेणाऱ्याना मी हा ‘पद्मश्री’ समर्पित करत आहे, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी सांगितले. दरम्यान, या पुरस्कारानंतर सिंधुताई सपकाळ यांचं मुख्यंमत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांनीही अभिनंदन केलंय.

साहित्य लेखनाची जबाबदारी खूप वाढली: नामदेव कांबळे
वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील साहित्यिक नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार गोष्टीत झाला असून या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे.आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. यामुळे साहित्य लेखनाची जबाबदारी खूप वाढली आहे. आता अजून गांभीर्याने लिहावे लागेल. सध्या हाताशी नवीन लेखन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र कथेच्या रुपात मांडतोय, हा एक नवीन प्रयोग आहे. आतापर्यंत असे चरित्र आलेले नाही असेहि त्यांनी सांगितले.

लोकशाहीच्या प्रवाहात माझा खारीचा वाटा: गिरीश प्रभुणे
सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले तेव्हा अनेकांच्या सहकार्याने हे काम करू शकलो. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्नेही, प्रचारक दामूअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर, रमेश पतंगे तसेच भटक्या विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते या सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे या विषयाला न्याय देण्यात मला यश मिळाले. महाराष्ट्रात पारधी म्हटले की चोऱ्या माऱ्या, दरोडे असे असायचे. पण यावर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १०० पारधी महिला, पुरुष निवडून आले. या लोकशाहीच्या प्रवाहात माझा खारीचा वाटा आहे, याचे मला समाधान आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी पुरस्काराची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे.