‘मोदी सत्तेत न आल्यास पाकिस्तानकडून देशाच्या संसदेवर हल्ला’ : भाजप मंत्र्याचे वक्तव्य 

गुवाहटी : वृत्तसंस्था – भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्य सुरुच असल्याचं दिसत आहे. आसाममधील मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांच्या वक्तव्याने पुन्हा याची प्रचिती आली आहे. हिमांता शर्मा यांनी पुन्हा एकदा भाजपाला निवडून द्या असे आवाहन करताना ते म्हणाले की, “जर पुन्हा एकदा भाजपा सत्तेत आल नाही, तर पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवादी देशाच्या संसदेवर बॉम्बहल्ला करतील.”

कामपूरच्या नायगाव येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते उपस्थितींना संबोधित करत होते. यावेळी बोलताना शर्मा यांनी भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले. शर्मा म्हणाले की, “देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि आसाममध्ये भाजप सरकार निवडून आले नाही तर, पाकिस्तानकडून देशाच्या संसदेवर हल्ला केला जाईल. इतकेच नाही तर, पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांकडून आसामच्या विधानसभा सभागृहावरही हल्ला होईल. आणि असे झाले तर, त्यावेळी असणारे पंतप्रधान काहीही करू शकणार नाहीत. कारण पाकिस्तानच्या त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचं धाडस त्या पंतप्रधानांकडे नसणार आहे.” असे म्हणत आसामचे मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी भाजपाला मत देण्याच आवाहन केलं आहे. इतकेच नाही तर, नवीन भारतच पाकिस्तानला समर्थपणे उत्तर देऊ शकतो, याच सरकारमध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं धाडस आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/himantabiswa/status/1102195273563029504
इतकेच नाही तर पाकिस्तानचा उदो उदो करणाऱ्या लोकांना काँग्रेस पाठिशी घालत असल्याचेही शर्मा यांनी सांगितले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्या 130 नागरिकांना अटक झाली आहे. या नेटीझन्सने सोशल मीडियावरून पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा उदो उदो केला होता. दरम्यान, शर्मा हे 2001 पासून 2015 पर्यंत भारतीय काँग्रेसचे सदस्य आणि आमदार होते. मात्र, मे 2016 मध्ये शर्मा यांनी भाजपाचे सदस्यत्व स्विकारले आहे.
यापूर्वीही निर्मला सितारमण यांनीही आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. बंगळुरू येथील थिंकर फोरमच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी ते वक्तव्य केले होते. इतकेच नाही तर, देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आले नाही तर देश 50 वर्षे पाठीमागे जाईल असेही त्यांनी म्हटले होते. यावेळी सोशल मीडियावरून त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.