सावधान ! विनाकारण घराबाहेर पडाल तर खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनामुळे कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. कडक निर्बंध लागू केले तरीही लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्यांना गृह अलगीकरणाचा सल्ला असे बाधित रुग्ण बिनदिक्कतपणे बाहेर फिरताना आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे समोर आले आहे. आता असे रुग्ण बाहेर फिरताना आढळ्ल्यास त्यांची थेट खासगी रुग्णालयात रवानगी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याचा खर्चही त्यांच्याकडूनच घेण्यात येईल असा इशारा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, आदी उपस्थित होते.

राज्यात बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढवा, ऑक्सिजन वाढवण्याचे निर्देश दिले आहे. सध्या ऑक्सिजन मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण त्यामुळे वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा तसेच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्याशिवाय बाधितांना गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

टोपे म्हणाले, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे त्याचा अपव्यय आणि अतिरिक्त वापर होणार नाही, याकडे लक्ष द्या. त्याशिवाय वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देण्यार्या तंत्रज्ञानचा वापर होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसवण्यासाठी प्रयत्न करावेत.

प्रधान सचिव डॉ. व्यास म्हणाले, खासगी रुग्णालयांना सक्रिय रुग्णसंख्या पाहून रेमडेसिविरचा पुरवठा केला जाणार आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासमवेत बैठक झाली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी राज्य कृती दलाने तयार केलेल्या प्रोटोकॉलअनुसार त्याचे पालन करण्याचे निर्देश यांनी दिले