बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये वापरलेल्या ‘SPICE’ बॉंबची भारताकडून खरेदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने इस्रायलशी ३०० कोटी रुपये किंमतीच्या स्पाइस बॉम्ब खरेदीचा करार केला आहे. इस्रायलकडून १०० पेक्षा जास्त स्पाईस बॉंब खरेदी करण्यात येणार आहेत. २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये भारतीय वायुसेनेने स्पाइस बॉंबचा वापर केला होता.

भारतीय वायू सेनेने जैश ची दहशतवादी तळी उध्वस्त करण्यासाठी ‘सुखोई ३०’ च्या मदतीने स्पाईस २००० बॉंंबचा वापर केला होता. आतापर्यंत या बॉंंबचा वापर फक्त मिराजमध्ये होत होता, परंतु सुखोई विमानामध्ये देखील या बॉंबचा वापर यशस्वी ठरला आहे.

स्पाइस बॉम्ब आपल्या भेदक क्षमतेसाठी विशेष ओळखले जातात. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या छुप्या तळांवर हवाई हल्ले केले होते. त्या हल्ल्यांसाठी हेच स्पाइस बॉम्ब वापरण्यात आले. हा बॉम्ब एका विशिष्ट जीपीएस गायडन्स किटसोबत लावला जातो. यामुळे बॉम्ब नेमकं लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरतात.

या करारानुसार, येत्या तीन महिन्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात हे अद्ययावत स्पाइस बॉम्ब दाखल होणार आहेत.