सरकारचा जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट आहे का ? : मुंडे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारच्या गृह विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या सरकारचा आव्हाडांना मारण्याचा कट आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी असे गलिच्छ राजकारण करू नका, असा सल्लाही दिला आहे.

शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न व समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेली परिवर्तन यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली. याप्रसंगी आ. आव्हाड आणि भुजबळ यांच्या कमी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेविषयी मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, आव्हाड आणि भुजबळ यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्याने पक्षाच्या नेत्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दोघांची सुरक्षा कमी करणे, ही बाब गंभीर असून निवडणूक तोंडावर असताना असा निर्णय धक्कादायक आहे.

आव्हाड यांना धमक्या आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा कमी करून सरकारने त्यांना मारण्याचा कट रचला आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भुजबळांच्या सुरक्षेविषयी बोलताना ते म्हणाले की, भुजबळ हे मोठे नेते आहेत. ते सरकारवर तुटून पडत असल्याने सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली आहे. निवडणुका तोंडावर असताना हा निर्णय झाल्याने त्यात काही कट तर नाही ना, असे गलिच्छ राजकारण करू नका. हा विषय शासनाने गांभीर्याने घ्यावा, असे सांगत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.