ख्वाजा शाहमन्सूर बाबांचा दर्गा हा ‘हिंदू – मुस्लिम’ ऐक्याचे प्रतीक ; सुप्यात उरुसाला सुरुवात

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – हिंदू-मुस्लीम भाविकांच्या भक्तीचे आणि ऐक्याचे प्रतीक असणारा सुपे ता.बारामती येथील ख्वाजा शाहमन्सूर बाबांच्या दर्ग्याचा उरूस शनिवार पासून मोठ्या दिमाखात सुरू झाला आहे. या उरुसाला संपूर्ण महाराष्ट्रातुन हिंदू-मुस्लिम भाविक येत असतात.

सुपे परिसरातील ग्रामस्थांचे तसेच महाराष्ट्रातील भाविकांचे हे श्रद्धास्थान असून त्यांना सुप्याचे ग्रामदैवत मानले जाते. कामानिमित्त बाहेरगावी असलेले येथील नागरिक, त्यांचे नातेवाईक व पाहुणे या उरुसासाठी आवर्जून येथे येत असतात. शनिवारी उरुसाचा पहिला दिवस होता या दिवशी संदलचा कार्यक्रम झाला असून आज रविवारी उरुसाचा मुख्य दिवस आहे.

आज सायंकाळी गावातील सर्व जाती धर्मांचे लोक एकत्र येऊन गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून नवस फेडतात तसेच गुळाची शेरणी (शरबत) बनवून ती सर्वांना वाटली जाते. यानंतर आज रात्री कोल्हापूरच्या झंकार बिट्स ऑर्केस्ट्राच्या मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे तर उद्या म्हणजे सोमवारी सायंकाळी चार वाजता कुस्त्या होणार असून रात्री दहा वाजता गुलजार नाझा आणि सिराज चिस्ती यांच्या सदाबहार कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कव्वालीचा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लोक येत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मंगळवारी दिनांक २३ रोजी उरुसाचा शेवटचा दिवस असून यामध्ये मुस्लिम बांधवांच्या धर्म गुरूंकडून कुरान वाचनाचा आणि बयान चा धार्मिक विधी संपन्न होतो. यानंतर जियारायतचा कार्यक्रम होऊन लंगर (भंडारा) होणार आहे. अशी माहिती दर्ग्याचे ट्रस्टी युनूस कोतवाल यांनी दिली असून त्यांसोबत यावेळी लतीफ कोतवाल, मुनिर डफेदार, सादिक कोतवाल हे उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या उरुसाची सुरुवात शनिवार पासून झाली असून संपूर्ण दर्ग्याचा परिसर विद्युतरोषणाईच्या प्रकाशात न्हाऊन निघाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त-