10 वी आणि 12 वी ची परीक्षा ऑफलाईनच, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बोर्डाची इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे रोजी तर इयत्ता बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २० मे रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली होती. या काळामध्ये परीक्षा ११ च्या ऐवजी १०.३० वाजता सुरु होणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करण्यात आला होता पण दुर्गम भागात ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ८० मार्कांच्या पेपरसाठी सडे तीन तास वेळ मिळणार आहे तर ४० व ६० मार्कांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढवून मिळणार आहेत. तसेच दिव्यांगांसाठी सगळ्या पेपरना अतिरिक्त एक तासाचा वेळ देण्यात आला आहे. तर प्रॅक्टिकलच्या परीक्षा गृहपाठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. राज्यात १० वीला १७ लाख तर १२ वीला १३ लाख विद्यार्थी बसले आहेत. परीक्षा ठरल्याप्रमाणे सकाळी १०.३० वाजता सुरु होणार आहे.

परीक्षेच्या काळात एखाद्या विद्यार्थ्यांस कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षांची परीक्षाकेंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे.

सुरक्षात्मक उपाय योजना
परीक्षेसंदर्भात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहे. कोरोनाच्या संदर्भातील केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे दिल्या जाणार आहेत. राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी असे आवाहन सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना करण्यात आले आहे.

दरवर्षी १० वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या पण या वर्षी कोविड -19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य घेण्यात येणार आहे. हे लेखनकार्य गृहपाठ पध्दतीने २१ मे ते १० जून या कालावधीत सादर करण्यात यावे असे बोर्डाकडून स्पष्ट केले आहे.

१२ वीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे ते १० जून या कालावधीत होणार आहे. कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे १२ वी च्या सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेनंतर १५ दिवसांच्या आत Assignment सादर करावे लागणार आहे.

दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषय परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासाठी १५ दिवसांची अधिक मुदतवाढ देण्यात येणार आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे.