राज्यपालांकडून ठाकरे सरकारचे कौतुक, म्हणाले – ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम’

पोलीसनामा ऑनललाईनः माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. कोरोनाविरोधातील लढाऊ सुरू असून राज्य सरकारने आता मी जबाबदार योजना सुरू केली आहे, असे म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार (दि. 1) पासून प्रारंभ झाला आहे. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले की, धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात राज्य शासनाने प्रभावीपणे काम केले आहे. सरकारने कोरोनासंबंधी मदतीसाठी टास्क फोर्स स्थापन केले आहे. आरोग्य सुविधांमध्येही आता वाढ केली आहे. कोरोनाच्या चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्याही वाढवण्यात आल्याचे ते म्हणाले. कोरोना संदर्भात उपाययोजना वाढवण्याची आणि दुसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

माझ शासन कर्नाटक महाराष्ट्र वादाबद्दल सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडत आहे. मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अंगणवाड्यांमध्ये न येऊ शकणाऱ्या मुलांना आणि गर्भवती मातांना घरपोच शिधा पोहोचवण्यात आला. शाळा बंद परंतु शिक्षण सुरू हा उपक्रमदेखील राबवण्यात आल्याचे राज्यपाल म्हणाले. तसेच औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगले काम केले आहे. आर्थिक अडचण असतानाही राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणादरम्यान म्हणाले.