मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला व हिंदी भाषकांचा टक्का वाढला, असा एक ताजा अहवाल जाहीर होताच चर्चेला प्रारंभ झालाय. मराठीमाणसांच्या हक्काकरिता लढणारे शिवसेना, मनसे यासारखे पक्ष असताना हे कसे घडले, अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झालीय. एकेकाळी मुंबई ही बहुसंख्य मराठी माणसांची होती, हे खरे आहे. मात्र, त्यामधील मोठ्या संख्येने वर्ग हा कष्टकरी, नोकरदार होता. त्यावेळीही मलबार हिल, पाली हिल, जुहू, खार वगैरे भागांत धनाढ्य मंडळी राहत होती व ती बहुतांश अमराठी होती. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की, मुंबईच्या आर्थिक नाड्या या नेहमीच अमराठी माणसांच्या हाती राहिल्या आहेत. जोपर्यंत या अमराठी धनिक लोकांना त्यांच्या कापड गिरण्या, केमिकल कंपन्या, इंजिनीअरिंग कंपन्यांमध्ये काम करण्याकरिता मराठी माणूस हवा होता, तोपर्यंत त्यांनी मराठी माणूस मुंबईत राहील, याची काळजी केली. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ मराठी माणसाच्या हिताचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेने स्थापनेपासून मराठी माणसांच्या नोकऱ्यांची चिंता वाहिली. मराठी माणूस नोकरी देणारा होईल, याकरिता प्रयत्न केले नाहीत. आपल्यालाही नोकरीवर ठेवणारा ‘मालक’ होण्याचे स्वप्न ना शिवसेनेने मराठी माणसाला दाखवले, ना मराठी माणसाने पाहिले. किंबहुना, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी कधीही मुंबईतील आर्थिक सत्ताकेंद्राशी संघर्ष केला नाही. हे देखील खरं आहे.
सगळ्या औद्योगिक शहरातला हाच प्रश्न
औद्योगिक श्रमिकनगरी ही मुंबईची ओळख पुसट होत चाललीय. अर्थनगरी अशी ख्याती असलेली मुंबई हळूहळू श्रीमंतनगरी होत आहे. केवळ श्रीमंतच मुंबईचा खराखुरा उपभोग घेऊ शकतात. बाकीचे फक्त लोकलच्या घुसमटून टाकणाऱ्या गर्दीचा, खिसा फाडणाऱ्या महागाईचा, पडक्या-गळक्या-आजूबाजूला तुंबलेली गटार वाहणाऱ्या घरांचाच भोग भोगू शकतात. सामान्य मुंबईकरांच्या या जीवनदर्शनाने हळळण्याची काही गरज नाही; कारण हा भोगवटा दूर करण्याचा दिलासा देत आपलं राजकारण यशस्वीरित्या पुढे रेटणारे मुंबईकरांच्या भाग्यरेषेत आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठीजनांनी मुंबईकरांच्या या होलपटीपासून वेळीच बोध घेण्याची जरुरी आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर हीच शहरं औद्योगिकरणात पुढारलेली होती. आज औद्योगिकीकरणाच्या विकेंद्रीकरणामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शहरं मुंबई-ठाण्यासारख्याच समस्या घेऊन वाढत असताना तिथला मराठी माणूस मात्र तिथल्या कारखानदारीत नोकरी मिळण्यासाठी धडपडताना दिसत आहे. त्या अद्योगिकतेच्या अनुषंगानं उभ्या राहू राहू शकणार्या छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायात शिरण्याचे मराठी तरुण टाळताना दिसत आहे. कोकणात रेल्वे आली. परंतु तिथल्या रेल्वे स्थानकावर मात्र चहाचा ठेला अग्रवाल नावाच्या माणसाचा! आर्थिक उलाढाली सुपरफास्ट व्हाव्यात यासाठी सरकारनं छोटी मोठी शहरे जोडणारी विमानसेवा सुरू केली आहे. या उलाढालींचा लाभ घेण्याइतपत मराठी माणूस उद्योगधंद्यात आहे का? मग या हवाई सेवेचा फायदा कोणाला?
मराठी माणूस भव्य, दिव्य स्वप्न पाहत नाही
कल्पनेचं दारिद्र्य घालावलं पाहिजे
मराठी माणूस उद्योग-व्यवसाय पडतो म्हणजे किती पडतो? ट्रॅव्हल एजन्सी, टेलिफोन बूथ, वडापावची गाडी नाहीतर कोणाच्या तरी आधाराने मिळवलेली सब काँट्रॅक्ट्स याच्यापुढे तो मोठ्या मुश्किलीने जातो. ‘वचने किं दरिद्रता’ असं म्हटलं जातं. कल्पनेचं दारिद्र आधी घालवलं पाहिजे. समृद्धीचा उगम हा मनातून होत असतो. समृद्धी म्हणजे केवळ पैसा नव्हे; तर आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्वप्रकारचं बळ म्हणजे समृद्ध! तशी बळकटी मिळवायची सोडून मराठी भाषेची गळचेपी होते’ म्हणून बोंब ठोक; नाहीतर ‘मातृभाषा बचाओ’ आंदोलन पुकार अशी वाया जाणारी शक्तिप्रदर्शन करणारे अधूनमधून उगवत असतात. परंतु अशा शक्तिप्रदर्शनातून मराठी भाषेच्याच शक्तीहीनतेचं दर्शन आपण घडवत आहोत याची कल्पना या मराठीप्रेमींना आहे का? मराठी माणूस टिकला तरच मराठी भाषा टिकेल! आणि मराठी भाषेला आज ‘अर्थ’ लाभला तरच मराठी माणूस उद्या टिकेल. असा अर्थ ‘शेठजीं’नी आपल्या भाषेला दिला म्हणून ते जगात कुठे गेले तरी सन्मानानेच राहतात. कुठेही त्यांची गळचेपी होत नाही. आपल्याला असं करता येतंच नसावं म्हणून आपल्या व्यापार-उद्योगाच्या चाव्या अमराठी माणसाकडे सुपूर्द कराव्या लागतात !
अमराठी लोकांकडे सत्तेची सूत्र आहेत
गिरणी संपातून मराठी माणूस हद्दपार
गिरण्या गेल्या, टॉवर उभे राहिले