खासदार राजू शेट्टींनी तडजोड करून एफआरपीचे तुकडे पाडले : रघुनाथ दादा पाटील

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन  – दोन वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी तडजोड करून एफआरपीचे तुकडे पाडल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. आज कोल्हापुरात ऊस दरासंदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. विशेष म्हणजे या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटना वगळून इतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी पुन्हा मुख्यमंत्री आणि खासदार राजू शेट्टी यांना टिकेच लक्ष केलं आहे.एकीकडे गुजरात पॅटर्न राबवा म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या उपस्थितीत एक रक्कम एफआरपीचा कायदा मोडला गेल्याच सांगितलं. तसच संपूर्ण महाराष्ट्रात एक रक्कम एफ आर पी 14 दिवसांच्या आत देण्याची व्यवस्था झाली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या वर्षी ऊसाला 3500 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि मागील एफआरपीचा उर्वरित हप्ता मिळाला नसल्याने 3 नोव्हेंबरला महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राजू शेट्टी खासदार झाल्या पासून उसाच्या रिकव्हरीचा बेस वाढत गेला आहे. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी तडजोड करून 2 वर्षा पूर्वी 80:20 असे एफआरपीचे तुकडे पाडले. शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे हडप करण्यासाठी राजकीय पक्षांनी राजू शेट्टी यांना उभं केलं आहे. अशी टीका रघुनाथ पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृह येथे विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची ऊस दारासाठी बैठक पार पडली.