‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांना पुन्हा धमकी !

मुंबई (Mumbai) : पोलिसनामा ऑनलाईन – मराठी साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे (bhalchandra nemade) यांना एका अनोळखी नंबरवरुन धमकी देण्यात आल्याची माहिती मिळतेय.याबाबत मुंबईतील (Mumbai) वाकोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलीय.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भालचंद्र नेमाडे यांनी 2 आठवड्यांपूर्वी एका अनोळखी नंबरवरुन धमकीचा फोन आला होता. त्यानंतर वाकोला पोलीस ठाण्यामध्ये एक तक्रार केली होती. नेमाडे हे सध्या यवतमाळमध्ये आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीतील वादग्रस्त उल्लेखामुळे भालचंद्र नेमाडे यांना धमकीचा फोन आला आहे, अशी माहिती मिळतेय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या कादंबरीमध्ये बंजारा समाजातील महिलाविषयी लिखाण केलंय. या लिखाणाबद्दल एका अज्ञात व्यक्तीने आक्षेप घेतलाय. भालचंद्र नेमाडे यांचं हे लिखाण बदनामीकारक आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या घरात घुसून मारहाण करु, अशी धमकी दिलीय,असे समजतंय.

भालचंद्र नेमाडेंना या अगोदरही दिली होती धमकी
नेमाडे यांना 2015 मध्येही धमकीचं पत्र आलं होतं. तेव्हा गृह विभागाने तातडीनं त्याची दखल घेतली होती. समाजसेवक नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर धर्मांध संघटनांनी उघडलेल्या आघाडीची गंभीर दखल राज्याच्या गृह खात्याने घेतली आहे, असे तेव्हा सांगण्यात आलं होतं. त्यामुळे भालचंद्र नेमाडे यांना धमकीपत्र मिळाल्याचं समोर आलं, त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.