प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे १० आमदार आमच्या संपर्कात आहेत असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. तसेच वंचित बहुजन आघाडी चे 48 उमेदवार निवडून येतील, असा देखील दावा लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते घडत नाही. ते स्वत:च निवडणुकीत दोन जागांवर पराभूत झाले आहेत. त्यांच्या संपर्कात आमचे आमदार का असतील? असा प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला.

लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकाही जवळ आल्या असल्याने राजकीय वक्तव्यांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे देखील प्रकाश आंबेडकरांनी याआधीच जाहीर केले आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा फटका पुन्हा महाआघाडीला बसणार असल्याने या घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष आहे.

आणखी काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर :
राजू शेट्टी हे कुणासोबत जाणार ते त्यांनी लवकर ठरवावे. आगामी विधानसभेत राज ठाकरे यांना चांगली संधी असून भाजप-शिवसेनेची युती असल्याने निर्माण होणारी पोकळी राज ठाकरे भरून काढू शकतील. राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आमच्या संपर्कात आहे.  इत्यादी खळबळजनक वक्तव्ये प्रकाश आंबेडकर यांनी जालन्यातील पत्रकार परिषदेत केली होती.