महायुती विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकणार : राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा युतीला दिल्या. आता विधानसभेच्या सर्व 12 जागा महायुतीच जिंकेल, असा दावा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. युतीचा ऐतिहासिक विजय होणार आहे. मुख्यमंत्री यांचे काम चांगले असून ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना विखे म्हणाले की, निवडणुकीत राज्याचे नेते म्हणून घेणाऱ्यांचे काय झाले, हे सर्वांना माहीत आहे.