अंबानींच्या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास ATS कडून NIA कडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास गृहविभागाने केंद्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे. आदेश मिळताच एनआयएकडून पुन्हा गुन्हा नोंदवून तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान हे कृत्य दहशतवादी संघटनांकडून करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. गावदेवी पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून आणि त्यानंतर दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) करत होते.

अंबानी यांचा अँटिलिया नावाचा बंगला दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर आहे. तेथे अभेद्य सुरक्षाव्यवस्था आहे. असे असतानाही बंगल्यापासून काही मीटर अंतरावर एक निनावी स्कार्पिओ आढळून आली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या २५ कांड्या व अंबानी कुटुंबियांसाठी धमकीचे पत्र सापडले होते. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. याचा तपस सुरु असतानाच ५ मार्चला मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत या स्कॉर्पिओचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला. हिरेन यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार एटीएसने अनोळखी इसमावर हत्येचा गुन्हा दाखल केला. बंगल्याच्या परिसरातील नागरिक कारमध्ये सापडलेल्या बनावट नंबर प्लेट व अन्य कागदपत्रांचा छडा लावण्यात येत आहे. त्याच बरोबर बंगल्याच्या परिसरातील कॅमेऱ्यातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मात्र, त्यातून कोणतीही ठोस माहिती अद्याप पुढे आलेली नाही.

दरम्यान, विरोधकांनी या तपासावर साशंकता व्यक्त करत हा तपास एनआयएकडे द्यावा अशी मागणी केली. त्यानुसार केंद्रीय गृह विभागाने एनआयएच्या मुंबई विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने करत होते, तपासात दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दुरीकडे स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) करत आहे मात्र, त्वरित छडा न लावल्यास तोही एनआयए आपल्याकडे वर्ग करून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

..यात नक्कीच काहीतरी काळंबेरं – मुख्यमंत्री
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करीत आहे. सर्व बाजू पडताळण्याचे काम सुरु आहे. असे असताना जर हा तपास एनआयएकडे देण्याचा डाव असेल तर त्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. त्यामुळे आम्हीही या प्रकरणाचा कसून तपास करून सर्व बाहेर काढू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.