इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांचा मोदी सरकारवर ‘हल्लाबोल’, मनसेनेही केली टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   लॉकडाऊन काळात स्थिर राहिलेल्या इंधन दरात हळूहळू वाढ झाली आहे. सध्या तर पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोमवारीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे २८ आणि २९पैसे प्रतिलिटर वाढविले आहेत. त्यामुळे पेट्रोलने नव्वदी पार केली. यामुळे देशातील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. इंधन दर वाढीवरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते श्रीवत्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इंधन दरवाढीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधतदेशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी वसुली केंद्र’ करा असं म्हटलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, पेट्रोल दर : ९० रुपये, वास्तव किंमत : ३० रुपये, मोदी टॅक्स : ६० रुपये. देशातील सर्व पेट्रोल पंपांची नाव बदलून ‘नरेंद्र मोदी वसुली केंद्र’ करण्यात यावं. तर, दुसरीकडे राज्यातील मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनीही पेट्रोल दरवाढीवरुन सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

अनिल शिदोरे हे नेहमीच ट्विटवरुन आपली भूमिका मांडत असतात. मोदी सरकारच्या कृषी विधेयकांचं समर्थन त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होत. पण, पेट्रोल दरवाढीवरुन शिदोरे यांनी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

त्यांनी आपल्या ट्विटरवर पेट्रोल, डिझेलचे सतत चढे दर ही चिंतेची गोष्ट आहे. वास्तविक मार्च ते डिसेंबर ह्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात ३% नी भाव उतरले. मात्र देशात पेट्रोल १७% तर डिझेल १५% नी वाढलं. ह्यात सरकारी करांचा वाटा पेट्रोलला ६३% तर डिझेलला ५८.६% आहे. इतका बोजा नागरिकांवर का?, असा सवाल विचारला आहे.

सुब्रमण्यम स्वामींचाही भाजपला घरचा अहेर

भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी इंधनाबाबतचे गणित मांडून
पेट्रोलचे दर ४० रुपये प्रति लिटर असायला हवेत, असं स्पष्ट सांगितलं आहे. ट्विट करून त्यांनी हि माहिती दिली. पेट्रोलच एक्स रिफायनरी मूळ किंमत ३० रुपये प्रति लिटर एवढी आहे. मात्र, सर्व प्रकारचे टॅक्स आणि पेट्रोल पंपाचे कमिशन मिळून ही किंमत ६०रुपयांनी वाढते. त्यामुळे, पेट्रोलचे प्रति लिटर दर ९० रुपये एवढे आहेत. माझ्या मते पेट्रोलच जास्तीत जास्त किंमत ४० रुपये प्रति लिटर असणे आवश्यक आहे. पेट्रोलचे दर देशात ९० रुपये प्रति लिटर झाले असून हि सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक असल्याचं स्वामींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.