‘तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी’ : काँग्रेस नेत्याची मोदींवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानामुळे टीकेचे धनी झालेले काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी भाजपाकडून होत असलेल्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी, अशा शब्दांमध्ये सिद्धूंनी मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी चार फोटो शेअर करत मोदींना टॅगदेखील केलं आहे. इतकेच नाही तर, त्यांनी, तुमच्या भाड्याच्या ट्रोल्सना घाबरत नाही अशा भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान सिद्धू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘पीएम साहब आप का डायलॉग खुद्दारी, किसी और का डायलॉग गद्दारी, सत्य पड़ेगा तुमपे भारी.’ सदर ट्विटमध्ये सिद्धू यांनी नरेंद्र मोदी यांचे दोन फोटो वापरले आहेत. यातील एक फोटो इम्रान खान यांच्यासोबतचा आहे तर दुसऱ्या फोटोत मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत दिसत आहेत. 25 डिसेंबर 2015 रोजी मोदी अचानक लाहोरला गेले होते. त्यावेळी काढण्यात आलेला फोटो सिद्धू यांनी ट्विट केला आहे.
ट्विट केलल्या दुसऱ्या फोटोत सिद्धू यांनी वर्तमानपत्रातील दोन बातम्यांची कात्रणं शेअर केल्याचं दिसत आहे. यात भारत, सौदी अरेबिया पाकिस्तानसोबत अनुकूल वातावरणात चर्चा करणार अशी पहिली बातमी आहे तर सौदीकडून दहशतवादाला निषेध; पण पाकिस्तानबद्दल मौन अशी दुसरी बातमी आहे.
तिसऱ्या फोटोत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत दिसत आहेत. कौर अकाली दलाच्या नेत्या आहेत. अकाली दल भाजपाचा मित्रपक्ष आहे.
सिद्धू यांनी जो फोटो ट्विटमध्ये वापरला आहे तो फोटो जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्या सुटकेशी संबंधित असल्याचं दिसत आहे. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा कंदाहार विमान अपघात प्रकरण घडलं होतं. त्यावेळी वाजपेयी सरकारने अजहरची सुटका केली होती.
अशा प्रकारे नवजोत सिंह सिद्धू यांनी ट्विट करत मोदींवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. सिद्धू यांनी पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्यानंतर भाजपने जोरदार टीका करत सिद्धूंवर निशाणा साधला होता. ‘दशतवादाला धर्म, देश नसतो पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढवा’ असं वक्तव्य सिद्धू यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्‍यांच्‍यावर सोशल मीडियावरू टीका झाली होती.