Pune News | पावसाच्या अवकृपेने पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; लाखो नागरिकांची पाण्यासाठी वणवण
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | कमी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यातील तब्बल १२४ गावे अद्याप पाणी टंचाईग्रस्त आहेत. येथे उन्हाळ्यात सुरू झालेली पाणी टंचाई यंदाचा पावसाळा संपत आला तरी सुरूच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील १० तालुक्यात पाणी टंचाईची स्थिती भीषण आहे. येथील २ लाख २२ हजार ३६० नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. (Pune News)
पुणे महसूल विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर पैकी कोल्हापूर जिल्हा टँकरमुक्त आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या ४ तालुक्यातील ७८ गावांमध्ये अजूनही पाणी टंचाई आहे. (Pune News)
सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यातील ३२ गावे, सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, करमाळा आणि माढा तालुक्यातील ४ गावे पाणी टंचाईग्रस्त आहे, तर पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील १० गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत.
विभागातील पाणी टंचाईग्रस्त १२४ गावांमधील २ लाख २२ हजार ३६० नागरिकांना १३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यापैकी ११२ खासगी, तर केवळ २२ सरकारी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी १०३ विहीर आणि विंधन विहिरी ताब्यात घेतल्या आहेत.
पावसाचे कमी प्रमाण आणि अद्याप सुरू असलेला टँकरद्वारे पाणीपुरवठा पाहता डिसेंबरपासून पाणीटंचाई गंभीर रुप
घेऊ शकते, त्यामुळे जिल्हा पातळीवर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे विभागीय आयुक्तालयाने सांगितले.
जिल्हानिहाय टँकरची स्थिती
जिल्हा टँकर गावे
पुणे ११ १०
सातारा ८४ ७८
सांगली ३५ ३२
सोलापूर ४ ४
कोल्हापूर – –
एकूण १३४ १२४
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा