बहारदार पारंपरिक लावण्यांनी पुणेकर घायाळ

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन-पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेला होता. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार, सिने अभिनेत्री लीला गांधी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले,डॉ मिलिंद भोई, नाट्यपरिषदेचे प्रकाश पायगुडे, सुरेश घुले, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेविका कालिंदा पुंडे, नगरसेवक मारुती तुपे, विकास रासकर,प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे ,महोत्सव समिती अध्यक्ष मित्रावरुण झांबरे,रेश्मा परितेकर, आकाश वाकचौरे,सहाय्यक पोलीस आयुक्त अंबुरे,वसंतराव सोनवणे, श्रीधर जिंतीकर, संतोष जगताप, भरत हगवणे, नाना नलावडे, ज्योतिबा उबाळे, मधुकर गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ तमाशा कलावंत रेखा काळे नेर्लेकर यांना पठ्ठे बापूराव पुरस्कार स्वरूप एकवीस हजार रुपये स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले. डॉ भास्करराव खांडगे पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांना व बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार शाहीर देवानंद माळी यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये, स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

गालावरील खळी, डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, नृत्य, अदाकारी या माध्यमातून मनुष्य जीवनातील विविध रंग व पैलू लोककलावंत उलगडून दाखवतात. गाण्यांमधील नेत्र कटाक्षाने भले भले घायाळ होतात. हे हिंदीमध्ये चालते मग मराठीत का नाही ? तिथे नाके मुरडू नका. असा सल्ला माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी दिला. तमाशा हे लोकरंजनाचे साधन आहे. लावणी मनामध्ये ठसते, तमाशा व लोककले बद्दल मला ममत्व आहे. महाराष्ट्राची ही लोककला समृद्ध होण्यासाठी कलावंतांचा उचित सन्मान होणे गरजेचा आहे. असे आवाहन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

तम म्हणजे अंधार, अशा म्हणजे प्रकाश या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही लोककला आहे. शेतकरी कामगार, दमल्या भागल्या जीवांना रिझवणारी ही लोककला आहे. अशा शब्दात माजी आमदार व ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शाहिरी हा महाराष्ट्राचा श्वास आहे. एकेकाळी याच शाहिरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले,संयुक्त महाराष्ट्र व अनेक आंदोलनात स्फुल्लिंग चेतविले. अशा ज्येष्ठ व श्रेष्ठ शहरी पंथाची सेवा माझ्याकडून घडते, यापेक्षा मोठे भाग्य नाही. पुन्हा जन्म मिळाला तो महाराष्ट्रात मिळावा व पुढचा जन्म शाहीराचाच असावा अशा शब्दात शाहीर देवानंद माळी यांनी लोककले बद्दल आदर व्यक्त केला.

पुरस्काराची रक्कम ही महत्त्वाची नसते ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो ते महत्त्वाचे असते. लोककलेसाठी ज्यांचे मोठे योगदान आहे असे नामवंत कलावंत, साहित्यिक, अभ्यासक यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे आम्हा कलावंतांचे भाग्याच आहे. अशा भावाना ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केल्या.

प्रास्ताविक कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे यांनी केले. स्वागत संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी केले. आभार रेश्मा परितेकर यांनी मानले.