विवाहितेच्या खूनप्रकरणी केडगावच्या तिघांना जन्मठेप

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन – विवाहिता रंजना गणेश कोतकर हिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून खून करण्यात आला होता. या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी आरोपी रामदास कचरू कोतकर, अलका रामदास कोतकर, कचरू बाळाजी कोतकर (रा. नेप्ती रोड, लालानगर, केडगाव, अहमदनगर) यांना दोषी धरून भादंवि कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मोहन पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

२५ मार्च २०१७ रोजी सकाळी ९ वाजता मयत विवाहिता रंजना हिची मुले घराबाहेर ओट्यावर खेळत होती. त्यावेळी मुले खेळताना दीर रामदास यांच्या ओट्यावर गेली. तेव्हा सासरा कचरू बाळाजी कोतकर, दीर रामदास कचरू कोतकर व जाव अलका रामदास कोतकर मुलांना शिवीगाळ करू लागले. यावेळी रंजना ही त्यांना शिव्या का देता, तुमची नेहमीचीच किरकिर आहे, तुम्ही आमच्याशी नीट वागा. असे समजावून सांगितले. त्याचा राग येऊन सासरा कचरू, दीर रामदास व जाऊ अलका हे विवाहिता रंजना हिच्या घरात आले व तिला शिवीगाळ करू लागले. त्यावेळी सासरा कचरू याने रंजना चे दोन्ही हात मागे ओढून धरले. दीर रामदास याने तिच्या अंगावर रॉकेल टाकले व जाऊ अलका हिने तिला काडी लावून पेटवून दिले.

यावेळी तिचे अंगावरील साडीने पेट घेतल्याने रंजना बाहेर पळाली. समोरून तिचा पती गणेश कोतकर आला व त्याने विझवण्याचा प्रयत्न केला. तेथे आजूबाजूचे लोक जमा झाले व तीला विझवले. तिला उपचारासाठी नगरचे सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. या घटनेबाबत मयत रंजना हीने सासरा कचरू, दीर रामदास, जाऊ अलका या तिघांविरुद्ध मृत्युपूर्व जबाब दिला होता. सिविल हॉस्पिटल येथे तिच्यावर उपचार सुरू असताना २६ मार्च २०१७ रोजी विवाहिता रंजनाचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. सहा. फौ. ए. वाय. राजे, तपासी अंमलदार संदीप भगवान पाटील, विशेष न्यायदंडाधिकारी जे. पी. जोशी आणि डॉ. सुप्रिया जगताप यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.

सरकार पक्षाचा पुरावा व युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी धरून भादवि कलम ३०२ नुसार जन्मठेप व प्रत्येकी ३ हजार रुपयेदंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मोहन पी कुलकर्णी यांनी काम पाहिले त्यांना पैरवी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल बी. बी. बांदल यांनी सहकार्य केले.

जन्मठेपेचा कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला