शालेय पाठ्यपुस्तकात कोरेगाव भीमाच्या इतिहासाचा समावेश व्हावा : रामदास आठवले़

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शालेय पाठ्यपुस्तकात कोरेगाव-भीमाच्या लढाईचा इतिहास समाविष्ट व्हायला हवा. हा इतिहास पाठ्यपुस्तकांत समाविष्ट झाला, तर तो सर्व मुलांनाही कळेल, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री, रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात आपण शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्याशी चर्चा करू त्याचबरोबर नव्या वर्षात आपण रिपब्लिकन पक्ष देशभरात मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. मी रिपब्लिकन अशी आमची घोषणा असेल, असेही आठवले यांनी सांगितले़

शुक्रवारी कोरेगाव भीमा येथे जाऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, दलितांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी देशात समता यायला हवी. दलित आणि सवर्णांमधील गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. गावागावांत एकी निर्माण व्हायला हवी असे झाले तर देशाचा विकास झपाट्याने होईल. नवीन वर्षात शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलित आदिवासी, ओबीसी आणि सवर्ण या सर्वांना न्याय देण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करेल, असेही आठवले म्हणाले़ प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी कोणताही ठोस प्लॅन नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात पत्रकारांनी विचाले असता, आठवले म्हणाले, राज्याकडे कोणताही प्लॅन नाही, हे मला माहिती आहे. मात्र, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस योजना आहे. आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जाईल.