आरक्षणाला विरोध करणारे काय आरक्षण देणार – धनंजय मुंडे

परभणी पोलीसनामा ऑनलाईन
राज्य आणि केंद्रातील भाजपा सरकार ज्यांच्या ईशा-यावरून चालते त्या नागपूरच्या संघ कार्यालयातून प्रत्येक 15 दिवसाला देशातील आरक्षणे संपवण्याची भाषा केली जाते. जे आरक्षण संपवण्याची भाषा करतात ते धनगर समाजाला काय आरक्षण देणार असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

परभणीच्या खंडोबा बाजार मैदान परिसरात अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुराणी, आमदार राहुल पाटील, आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, आमदार विजय भांबळे, माजी खासदार सुरेश जाधव, विठ्ठलराव रबदाडे, प्रा. शिवाजी दळणकर, डॉ. विवेक नावंदर, दिनेश परसावत, संयोजक मारोतराव बनसोडे मामा आदी यावेळी उपस्थित होते.

खांद्याला खांदा लावून सर्वात पुढे असेल-
राज्य सरकारने धनगर समाजाची 4 वर्षांपासून फसवणूक केली आहे. पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देण्याची घोषणा करणा-यांना 200 बैठका होऊनही आरक्षण का देता आले नाही ? असा सवाल उपस्थित करतांनाच आरक्षणाच्या या लढाईत मी धनगर समाजाच्या खांद्याला खांदा लावून सर्वात पुढे असेल अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली. सोलापूरच्या विद्यापीठाला अहील्याबाई होळकर यांचे नाव देण्याची सरकारची घोषणाही फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ एका समाजासाठी मर्यादित नाही तर त्यांनी समस्त मानव जातीसाठी कार्य केले आहे त्यामुळे त्यांच्या जयंतीचे कार्यक्रम केवळ एका समाजाने न करता सर्व समाजाने एकत्र येऊन करावेत अशी अपेक्षा त्यांनी केले. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.