CM तीरथ सिंह रावतांच्या विधानावरून उर्मिला मातोंडकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या – ‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे वरीष्ठ नेते आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे सध्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. रावत यांनी देहरादून येथील कार्यक्रमात आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात हे सगळे बरोबर आहे का, हे कसले संस्कार असे विधान केले होते. रावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरातून पडसाद उमटत आहेत. त्यांच्या विधानानंतर प्रसिध्द अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली आहे. फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार तरुण सांभाळतील, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय असा सवाल मातोंडकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री रावत यांच्या या वादग्रस्त विधानामुळे देशभरातून राग व्यक्त केला जात आहे. शिवसेनेच्या अनेक महिला नेत्यांनी ट्वीट करीत त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फाटक्या जीन्सच्या वापरावरून रावत यांनी महिलांच्या संस्कारांबाबत भाष्य केले होते. त्यांनी यावेळी एक अनुभव सांगितला होता. ते म्हणाले की, मी एकदा विमान प्रवासात होतो. त्यावेळी एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन बसली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातली होती. यावेळी मी त्यांना विचारलं की कुठे जायचे आहे.? यावेळी महिलेने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. तसेच ती म्हणाली की, तिचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि महिला स्वयंसेवी संस्था चालवते. यावर माझ्या मनात विचार आला, जी महिला NGO चालवते आणि फाटलेली जीन्स घालते, ती समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल असे म्हणाले. जेंव्हा मी शाळेत होतो तेंव्हा असे नव्हते असेही त्यांनी सांगितले.