आता RTGS, NEFT साठी बँकांची गरज नाही, RBI ची मोठी घोषणा

नवी दिल्ली : इंटरनेटमुळे ऑनलाइन बँक व्यवहार करणं शक्य झालं आणि त्यामुळे पैशाची देवाणघेवाण अनेक अर्थाने सोपी झाली. संगणक किंवा मोबाईलचं एक बटण दाबलं की पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्याची सोय झाली. त्यासाठी ना बँकेत जावे लागते ना चेक लिहून द्यावा लागतो. त्यामुळे देशात डिजिटल पेमेंटचा वेग कमलीचा वाढला आहे. कोरोना संकटात अनेकजण बँकेत जाणे टाळत असून डिजिटल ऑनलाईन सेवेचा वापर करत आहेत. हे विचारात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरण समितीच्या आढावा बैठकीत मोठी घोषणा केली आहे. आता RTGS आणि NEFT द्वारे पैसे पाठवण्यासाठी ग्राहकांना बँकांची गरज लागणार नसल्याचे म्हटले आहे.

रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टिम (RTGS) आणि नॅशनल इलेक्ट्रीक फंड ट्रान्सफर (NEFT) या दोन सुविधांद्वारे समोरच्या व्यक्तीला काही मिनिटांत पैसे पाठविता येतात. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी याबाबतची घोषणा करताना म्हटले की, आता या सेवा बँकाच नाहीतर नॉन बँकिंग पेमेंट सिस्टिम ऑपरेटरदेखील देऊ शकणार आहेत. म्हणजे आता आरटीजीएस किंवा एनईएफटी करायचे असेल तर बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.

RTGS आणि NEFT ही एक सेट्रलाईज पेमेंट सिस्टिम आहे. मात्र, तरी देखील तिची व्याप्ती आता वाढवण्यात आली आहे. या सेवा प्रीपेड पेमेंट इनस्ट्रुमेंट, कार्ड नेटवर्क, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स देखील देणार आहेत. आरबीआयने सांगितले की, ही सेवा वाढवल्याने आर्थिक प्रणालीमधील सेटलमेंटची जोखीम कमी करण्यात मदत मिळणार आहे. याशिवाय देशातील डिडिटल व्यवहारांच्या सुविधेत वाढ होणार आहे. सध्या RTGS आणि NEFT सेवा आरबीआयने मोफत केली होती. 6 जून 2019 मध्ये आरबीआयने हा निर्णय घेतला होता. आता हि सुविधा 24 तास सुरु आहे.