मराठा आरक्षणाचे श्रेय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना जाते, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोणाची लाचारी करू नका, असे संभाजी राजे यांना उद्देशून वक्तव्य केले होते. यावरून या दोन नेत्यांमध्ये चांगलाच वाद रंगला होता.
दरम्यान, संभाजी राजे यांनी रामदास कदम यांच्या टीकेला जास्त महत्व दिलेले नाही. रामदास कदम यांना माझ्याविषयी काय वाटते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. माझ्याकडे करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे अशा लहानसहान गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही, असे सांगून टिकेकडे दुर्लक्ष केले. तर धमकीबाबत त्यांनी सांगितले की, मी कोणाला काहीही सांगितलेले नाही. माझी तशी संस्कृती नाही. जे झाले ते चुकीचे होते, असे सांगून मोठेपणाही दाखवला. मात्र सकल मराठा समाजाने या वादात उडी घेतल्यामुळे वाद चिघळण्याची शक्यता आहे.