शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार राज्यातील 4 वैज्ञानिकांना जाहीर

पोलिसनामा ऑनलाईन – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (सीएसआयआर) विज्ञान, संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार यंदा राज्यातील डॉ. अमोल कुलकर्णी, डॉ. सूर्येदू दत्ता, डॉ. किंशूक दासगुप्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन यांना जाहीर झाला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या 45 वर्षांंपर्यंतच्या शास्त्रज्ञांना, पुरस्कार वर्षांच्या आधीच्या पाच वर्षांतील संशोधनाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दिला जाणर्‍यांमध्ये पुण्याचे डॉ. अमोल कुलकर्णी यांचा समावेश असून ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक आहेत. अभियांत्रिकी विज्ञान शाखेत त्यांचे संशोधन आहे. औषधे, रंग, सुवासिक रसायने व नॅनोपदार्थ यांच्या निर्मितीत लागणार्‍या घटकांच्या निर्मितीसाठी वापर केल्या जाणार्‍या रासायनिक भट्टयांची रचना आणि विकासामध्ये त्यांनी मोठे काम केले आहे. तसेच भारतातील पहिली ‘मायक्रोरिअ‍ॅक्टर लॅबोरेटरी’ उभारण्याचा मान डॉ. कुलकर्णी यांच्याकडेआहे. डॉ. सूर्येदू दत्ता आणि डॉ. यू. के . आनंदवर्धनन आयआयटी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. डॉ. दत्ता हे भूवैज्ञानिक असून, डॉ. आनंदवर्धनन गणित वैज्ञानिक आहेत. डॉ. दासगुप्ता भाभा अणू संशोधन केंद्रात काम करतात. शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयर) 79 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.