शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिली होती कोरेगाव भीमाची पूर्वसूचना 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव येथे मागील वर्षी झालेल्या अनुचित घटनेची पूर्वीसूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून दिली होती. कोरेगाव भीमा येथे ठिकाणी काही तरी अनुचित घडू शकते, अशी शक्यता पवार यांनी त्या पत्रात वर्तविली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्राची दखल घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या पत्राची दखल घेऊन तातडीने काही उपाययोजना केल्या असत्या तर भीमा कोरेगावची दंगल टाळता आली असती, अस गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड हे नागपुरात एका कामानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आव्हाड म्हणाले, भीमा कोरेगाव येथील घटना ही पूर्वनियोजित होती. दंगल घडविण्यासाठी काहीजण या ठिकाणी काही दिवसांपासून सतत प्रयत्न करीत होते. याची शंका अनेकांना आली होती. यामुळेच शरद पवार यांनी राज्य सरकारला या दंगलीपूर्वी पत्र पाठविले होते.

यात भीमा-कोरेगावमध्ये काही अनुचित घटना घडण्याची शक्‍यता व्यक्त केली होती. या पत्राची मुख्यमंत्र्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. राज्य सरकारने या पत्राची दखल का घेतली नाही? जे अन्य नागरिकांना कळते ते राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाला का कळले नाही? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. या दंगलप्रकरणी एकाही पोलिसावर राज्य सरकारने कारवाई केली नाही यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. भीमा-कोरेगाव हे शौर्याचे प्रतीक आहे. या ठिकाणी शौर्याला अभिवादन करण्यासाठ जात असतात.