SSC-HSC Exam : बोर्डाचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘विद्यार्थ्यांनो, पास होण्याच्या पात्रतेत कोणताही बदल नाही, ती केवळ अफवा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरवल्या जात आहेत. यंदा पास होण्यासाठी 35 ऐवजी 25 टक्के गुण पुरेशे ठरणार अशा चर्चां रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षेत पास होण्याच्या पात्रतेत कोणताही बदल केला नाही. ती केवळ अफवा असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

यंदा दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे. पण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याबाबत येत्या दोन दिवसात बोर्डाकडून पुन्हा मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.10 वी ची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 दरम्यान होईल. तर बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 दरम्यान होईल. परीक्षा या लेखी पद्धतीनेच होणार असल्याचे यापूर्वीच सरकारने स्पष्ट केले आहे. पण आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रोज वाढत जाणारी रुग्णसंख्य़ा यामुळे प्रशासन आणि बोर्ड काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे. याबाबत बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती दिली जाणार आहे.