आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

आणीबाणीच्या काळात कारावासात असलेल्या व्यक्तींना राज्य सरकार पेन्शन देणार आहे. ही पेन्शन एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तींना मिळणार आहे. प्रति महिना दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आणीबाणीच्या काळात लोकशाहीकरता लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासंदर्भातील धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे देखील उपस्थित होते.

अशी असेल पेन्शन
आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अडीच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पेन्शनसाठी असे असतील निकष
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींनी शपथपत्र अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे लागणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे . त्यानंतर संबंधित व्यक्तींना याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध होईल. यानंतर याची पडताळणी करून रेकॉर्ड तापसल्यानंतर त्यांच्या खात्यात पेन्शन जमा करण्यात येईल.