विधानसभा अध्यक्षपदावरून सरकारमध्ये तणाव ; CM उध्दव ठाकरे नाराज ?

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लावायची यावरून महाविकास आघाडीत अजून एकमत झालेले नाही. तिन्ही पक्षाला मान्य होईल असे नाव येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाआघाडीमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्यासाेबत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर पटाेले यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांच्याकडे मंत्रीपदाची दुहेरी जबाबदारी देण्यात आली हाेती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. काँग्रेसला आक्रमक आणि तडफदार नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी बसवण्याची मनीषा होती. अनेकांनी या पदासाठी फिल्डिंग लावली होती. परंतु, संभाव्य प्रदेशाध्यक्षपदाच्या यादीत नाना पटाेले यांचे नाव आघाडीवर हाेते, तसेच पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगाेपाल यांनीही पटाेले यांच्या नावाला पसंती दिली हाेती अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटाेले यांच्या नावावर शिक्कामाेर्तब हाेण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष काेण?
विधानसभा अध्यक्षपदाचा पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हा विषय औत्सुक्याचा आहे. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद देण्यावर सध्या चर्चा असुर आहे. पहिल्यांदाच आदिवासी समाजाला हे पद मिळणार असल्याने राज्यातील महाआघाडी सरकारची छबी आणखी उठावदार दिसेल असेही बोलले जाते.
सरकार स्थापनेवेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर दावा करण्याचे संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर हा गुंता वाढण्याची शक्यता आहे. सरकार स्थापनेसाठी सर्वानुमते सहमती मिळालेल्या फाॅर्म्युल्यावर काँग्रेस ठाम आहे.

मुख्यमंत्री नाराज?
नाना पटाेले यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या राजीनाम्यावरून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. पटाेले यांचा राजीनामा देण्यापूर्वी बाळासाहेब थाेरात, अशाेक चव्हाण आणि सुनील केदार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी ठाकरे यांनी अहमद पटेल हयात असताना पूर्वचर्चेविना असा निर्णय कधीही घेण्यात आला नसल्याचे सांगत उघड नाराजी व्यक्त केली. तसेच के.सी. वेणुगाेपाल यांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीवरून त्यांनी शंकाहि उपस्थित केली.