‘त्या’ ठरलेल्या ९ लग्न सोहळ्यात निवडणूक आयोगामुळे बाधा

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

नवी मुंबई मधील आगरी-कोळी भवनमध्ये आयोजित ९ लग्न सोहळे रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतर मतपेट्या ठेवण्यासाठी हा हॉल घेतल्यामुळे हे लग्न सोहळे अन्यत्र हलवावे लागणार आहेत.

नेरुळ येथील आगरी कोळी भवनामध्ये 23 ते 29 जून दरम्यान नऊ लग्न समारंभ आयोजित केलेले आहेत. या हॉलमध्ये लग्नकार्य करण्यासाठी तीन महिने आधीपासून बुकिंग करण्यात आलेली आहे. परंतु कोकण पदवीधर मतदार संघाची मतमोजणी करण्यासाठी आणि मतपेट्या ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 23 ते 29 जून या कालावधीत हा हॉल भाड्याने घेतला आहे.

पालिका आणि सिडको यांच्या अनेक ठिकाणी जागा असताना, आगरी-कोळी हॉलमधील लग्न कार्य रद्द करुन कशाला मतमोजणी घेतली जात आहे आम्ही कॅटरर्स, मंडप डेकोरेशन यांना ऑर्डर दिलेली असल्यामुळे अचानक विवाह इतर ठिकाणी हलवायचा कसा, असा संतप्त सवाल वधू-वरांच्या कुटुंबीयांनी उपस्थितीत केला असून , शहरातील इतर हॉल बुक असल्याने आमच्या मुलांचे विवाह लावायचे कोठे, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातोय.

निवडणूक आयोग दुसरीकडे मतमोजणी करणार कि आगरी-कोळी भावनातच घेणार , कुटुंबियांकडून विवाह सोहळे इथेच पार पाडू देण्याची मागणी होत असल्याने , आयोग नेमका काय तोडगा काढणार याकडे कुटुंबीयाचे लक्ष लागले आहे.